मुंबई \ ऑनलाईन टीम
‘सन्मान देवदूतांचा’ या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप युती आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद यांवर मिश्किल भाष्य केले. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय राज्यमंत्री रामदास यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात आठवलेंनी आपल्या चारोळ्यातून टोपेंचं कौतुक तर फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर मिश्किलपणे देखील बोट ठेवलं. ‘त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते’, असं आठवले म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपची ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की शिवसेनेला अडीज वर्षाचं मुख्यमंत्रिपद देऊन टाका… माझं जर ते म्हणणं फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणाले. आठवले एवढंच बोलून थांबले नाहीतर तर तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असंही त्यावेळी मी सांगितलं होतं, अशी आठवणही आठवलेंनी सांगितली. आठवलेंच्या विधानांनी आणि सत्तासंघर्षकाळातल्या आठवणींनी सभागृहातील उपस्थित पोट धरुन हसले. तर फडणवीस आज मुख्यमंत्री असते, असं आठवले म्हणताच देवेंद्र यांच्या चेहऱ्यावर देखील स्मितहास्य उमटलं.
कोरोना संकटाच्या कालावधीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तम काम केले. घरच्या कुटुंबाप्रमाणे राज्यातील जनतेची काळजी घेतली. विरोधक भाजपनेही टोपे यांच्यावर कधी टीका केली नाही, असे सांगत आठवले यांनी राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.