ऑनलाईन टीम / मुंबई
सचिन वाझे प्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं असताना काँग्रेस मात्र शांत का ? 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेटवर काँग्रेस का बोलत नाही ? ,काँग्रेसलाही वाटा दिला जात होता का ?, असा खडा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांनाच हप्तेखोरीचा मोठा अनुभव आहे. तर त्यांनीच पाच वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किती वाटा दिला ? ते स्पष्ट करावे, असे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.
वसुली बाबत आम्हाला विचारण्यापेक्षा वसुली कशी करतात ? वसुलीतील वाटा किती असतो ? आणि त्याचे वाटप कसे केले जाते ? याचा दांडगा अभ्यास फडणवीस यांना आहे त्यामुळे त्यांनीच आपला अनुभव सांगावा. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात विभागात संघाच्या सदस्यांना केसे कसे घुसवले होते, आणि त्यांना वसुलीअंती किती मिळत होते. यातील संघाला किती वाटा जात होता, या बाबत चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण करणार असल्याचं देखील पटोले यांनी स्पष्ट केलं.
सत्तेत असताना वरिष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरुन कोणाचा वाटा किती द्यावा याबद्दल फडणवीस यांना मोठा अनुभव आहे. राजभवनाच्या माध्यमातूनही भाजपचे जे उद्योग सुरु आहेत. पण महाराष्ट्राची जनता हा खेळ जाणुन आहे, असा टोला ही पटोले यांनी विरोधी पक्षांना लगावला.