नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु असतानाच आता सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीचं नेमके कारण स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लोकसभेत आज १२७ वं घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार होतं. या विधेयकाला याच अधिवेशनात मान्यता मिळावी यासाठी अमित शहांना भेटून विनंती केली. त्यांची पण तयारी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच ते पुढे म्हणाले की, विरोधक कामकाज होऊ देत नसल्याचा आरोप करत या विधेयाकाकरिता तरी कामकाज होऊ द्यावं, अशी मागणी केली.
विरोधकांनी ५० टक्क्यांच्या मर्यादेचं नव्याने शोधलेलं कारण आहे. इंदिरा सहानी खटल्यातील निर्णय अतिशय स्पष्ट आहे. यातील गंभीर मुद्दा टक्केवारी नाहीच आहे. महत्त्वाचा मुद्दा मागास घोषित होणं हे आहे. तुम्ही एखाद्या समाजाला मागस घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं हा नंतरचा भाग आहे. अजून तुम्ही मागास घोषित करत नाहीत. केंद्राकडे अधिकार आहेत म्हणून मागास घोषित केलं नाही. आता राज्यांना अधिकार दिले आहेत, आता कार्यवाही करा, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.