हिंडलगा येथे प्रचारसभा : शिवसेना राजकारण करत असल्याचा केला आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
म. ए. समितीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शिवसेना राजकारण करत आहे, असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. म. ए. समितीने कधीच लोकसभा निवडणूक लढविली नाही. मात्र, यावेळी निवडणूक लढवत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी संजय राऊत बेळगावात आले. संजय राऊत बेळगावात आले म्हणून मी आज बेळगावात आलो आहे, असे सांगत शिवसेनेवर त्यांनी टीका केली. हिंडलगा येथे भाजपची सभा पार पडली. त्या सभेमध्ये त्यांनी ही टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कायापालट करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. त्यांनी विकासाची गंगा देशामध्ये आणली. ती यापुढेही सुरूच राहणार आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून दिवंगत खासदार सुरेश अंगडी चार वेळा विजयी झाले. मराठी भाषिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आता त्यांच्या पत्नी मंगला अंगडी निवडणूक लढवत आहेत. त्यांनाही मराठी भाषिक निश्चितच मतदान करतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत हे बेळगावमध्ये का आले? याचे कारण मला हवे आहे. मराठी भाषिकांनी आजपर्यंत हिंदुत्वाचा झेंडा हातामध्ये घेतला आहे. असे असताना येथे येऊन मराठी भाषिकांची दिशाभूल करण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे. म. ए. समितीचा उमेदवार बसविण्यामागे केवळ काँग्रेसला निवडून देण्याचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही काँग्रेसवर टीका करत नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले आहे. सुरेश अंगडी यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी मला संधी द्यावी, असे आश्वासन उमेदवार मंगला अंगडी यांनी दिले. या सभेला मंत्री जगदीश शेट्टर, मंत्री उमेश कत्ती, माजी आमदार व भाजपचे ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील, आमदार अनिल बेनके, धनंजय जाधव, उज्ज्वला बडवाण्णाचे, मनोहर कडोलकर, रामचंद्र मन्नोळकर यांच्यासह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.