नाशिक/प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेतृत्व संपविल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) नाशिक विभागाचे अध्यक्ष तथा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या हातात सूत्रे दिल्यास चार महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देईल, तसे न झाल्यास राजकीय संन्यास घेईल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जरी फडणवीसांनी सन्यास घेण्याची भाषा केली असली तरी त्यांना संन्यास घेण्याची गरज नाही. या सरकारला त्यांनी काय सूत्र आहे ते सांगावे. ओबीसींच्या बाबतीत एवढी तळमळ आहे तर तुम्ही कोणते ओबीसी नेते मोठे केले ते सांगा. जे ओबीसी नेतृत्व आहे ते संपवले, अशी टीका ढवळे यांनी केली.
विश्रामगृहात ढवळे यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य जॆले. एकलव्य संघटनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांत उद्भवलेल्या नवीन समस्या जाणून घेण्यासाठी ढवळे यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. दौऱ्यानंतर संघटनेचा कृती कार्यक्रम ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.