तरूण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थिल्लर आहेत. सरकार चालवयाला दम लागतो ते निष्क्रिय व बेजबाबदार असून मातोश्रीतून आता ते बाहेर पडले, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर कधी पहाणी करणार, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, असा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि.19 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. करमाळा तालुक्यातील नुकसानीची त्यांनी सायं. 6 च्या सुमारास पाहणी केली. पाहणी दरम्यान, त्यांनी कंदर, शेलगाव, वरकटणे या गावांबरोबर विविध ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना मदतीची गरज आहे, अशा वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी. केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असे सांगून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारकडे 60 हजार कोटींचा जीएसटी थकल्याच्या आरोपाचे खंडन केले.
राज्यावर 50 हजार कोटींचे कर्ज आहे. आणखी 70 हजार कोटी काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे सांगत कर्ज काढा; पण शेतकऱ्यांना मदत करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. आम्ही केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत केली होती. आता केंद्राची वाट का पहाता ? असा सवाल उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार हे दिशाभूल करत आहेत, असा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
यावेळी त्यांचे सोबत खा. रणजितसिंह नाईकनिंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, महेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी दौऱ्यासाठी करमाळा तालुका भाजपातर्फे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात सहभागी झाला होता. यावेळी नवनाथ शिंदे, भिमराव माने, गोकुळ माने, अरूण डांगे, सुनील लोकरे, शौकत जहागीरदार या शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच लोकरे वस्ती आणि जहागीरदार वस्तीला जाणारा रस्ता पूर्ण वाहुन गेल्याची पहाणी केली. याप्रसंगी नुकसान ग्रस्त शेतकर्यांची पहाणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन,करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, प्रांतिक विठ्ठलराव भनगे,रामभाऊ ढाणे, भगवान गिरी, श्याम सिंधी, रवी कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष, कंदरमधील बंडू माने, सरपंच भास्कर भांगे, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, आण्णासाहेब पवार, नवनाथ शिंदे, अमोल डांगे, भगवान तनपुरे आदी उपस्थित होते.