शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा : पाचपैकी चार उमेदवारी अर्ज वैध
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधानसभेवरून राज्यसभेच्या चार जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. त्यानुसार निजद उमेदवार माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा भाजप उमेदवार ईरण्णा कडाडी, अशोक गस्ती, काँग्रेस उमेदवार माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांचा राज्यसभेतील प्रवेश निश्चित झाला आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱयांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागांसाठी 19 जून रोजी निवडणूक घोषित केली होती. चार जागांसाठी भाजपकडून दोन, निजद आणि काँग्रेसकडून प्रत्येकी एक आणि एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. विधानसभेच्या सचिव तथा निवडणूक अधिकारी एम. के. विशालाक्षी यांनी बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी केली. त्यावेळी अपक्ष उमेदवारासह चार उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून एकाही आमदाराची स्वाक्षरी नसल्याने तो अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे चार जागांसाठी चार उमेदवार निवडणून रिंगणात असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार दि. 12 जूनपर्यंत मुदत आहे. त्यानंतर निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा केली जाईल.
कर्नाटकातील राज्यसभा सदस्य असणारे प्रा. एम. व्ही. राजीव गौडा (काँग्रेस), बी. के. हरिप्रसाद (काँग्रेस), डॉ. प्रभाकर कोरे (भाजप) आणि डी. कुपेंद्र रेड्डी (निजद) यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱया राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. विधानसभेतील सदस्य संख्याबळाच्या आधारे भाजपला दोन जागा मिळणे निश्चित होते. तर काँग्रेस आणि निजदला प्रत्येकी एक जागा मिळणार असल्याचे स्पष्ट होते.
भाजपमध्ये नव्या चेहऱयांना संधी
भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच निर्माण झाली होती. सहापेक्षा अधिक जण या शर्यतीत होते. विद्यमान राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, माजी खासदार रमेश कत्ती यांची नावेही चर्चेत होती. तथापि, मुडलगी तालुक्यातील कल्लळ्ळी येथील भाजप नेते ईरण्णा कडाडी यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी जाहीर केली. कडाडी यांनी यापूर्वी अरभावी विधानसभा मतदारसंघातील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष, गोकाक तालुका भाजप अध्यक्ष, बेळगाव जिल्हा भाजप सचिव तसेच बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्याचप्रमाणे राज्य भाजपच्या सचिवपदाची जबाबदारही पेलली आहे. 2010 मध्ये बेळगाव जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. ते विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. तर आणखी एका जागेसाठी रायचूरमधील अशोक गस्ती यांना उमेदवारी देण्यात आली होती.
देवेगौडांना काँग्रेसचा पाठिंबा
राज्यसभेची एक जागा स्वबळवर जिंकण्यासाठी निजदकडे विधानसभेत पुरेशी सदस्यसंख्या नाही. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुढाकार घेत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना राज्यसभा निवडणूक लढविण्याबरोबरच विजयाकरिता पुरेशी मते मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे देवेगौडा राज्यसभेवर जाण्यासाठी तयार झाले.