प्रतिनिधी/दापोली
दापोली तालुक्यातील माटवण येथील देव्हारी नदीवर असणार्या पुलाचा वाहून गेलेला भराव पुर्ववत न करण्यात आलेल्या परिसरातील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. शिवाय आता तीन महिन्यांवर पावसाळा आला तरी याबाबत प्रशासन उदासिनता दाखवत असल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे.
देव्हारी नदीवर तालुक्यातील माटवण व टांगर आदी गावांना जोडणारा हा पुल काही वर्षांपुर्वी बांधण्यात आला आहे. हा पूल केवळ देव्हारी नदीच्या पाण्याचा विचार करून बांधण्यात आला. त्यामुळे दुसर्या नदीच्या पाण्याचा यावेळी विचार न करण्यात आल्याने दरवर्षी येथे पाण्याचा फुगवटा निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थ सखाराम महाडीक यांनी बोलताना केला. अखेर गेल्यावर्षी या पुलाचा टांगरच्या बाजूचा भराव वाहून गेला. यामुळे टांगर व माटवण या दोन गावांचा संपर्क तुटला.
माटवण गावात माटवण हायस्कूल आहे.येथे कुडावळे, माटवण, टांगर, शिरसोली, हातिप, करंजाणी, म्हाळूंगे, देवघरवाडी, पाचवली तसेच गणपतीपुळे येथून विद्यार्थी येतात. मात्र या पुलाचा भराव वाहून गेल्याने गावात येणाऱया राज्य परिवहन महामंडळाच्या बस पावसाळ्यापासून बंद झाल्या आहेत. यामुळे टांगर व शिरसोली येथील विद्यार्थ्यांना तब्बल1 तास पायपीट करून शाळेत यावे लागते. यामुळे हा वाहून गेलेला भराव तात्काळ पुर्ववत व्हावा व गावात येणार्या गाड्या लवकर सुरू व्हाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांकडून व ग्रामस्थांकडून होत आहे.