आतापर्यंत 16 हजार 540 रूग्णांनाडिस्चार्ज
विविध राज्यांमध्ये रूग्णसंख्या वाढत असतानाच रूग्ण बरे होण्याचा टक्काही वाढत असल्याची दिलासादायक बाब शुक्रवारी स्पष्ट झाली. कोरोनाबाधित तीनपैकी एक रूग्ण बरा होत आहे. एकुण 29.36 टक्के रूग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत उपचार घेत असलेल्या 16 हजार 540 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली. देशातील 42 जिल्हय़ांमध्ये मागील 28 दिवसांत एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. तर 29, 36 आणि 14 जिल्हयांमध्ये अनुक्रमे 21, 14 आणि 7 दिवसांमध्ये एकही रूग्ण आढळलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील 24 तासांमध्ये देशात नवे 3 हजार 390 रूग्ण आढळले. तर 1273 जण पूर्ण बरे झाले आहेत. 37 हजार 916 जणांवर उपचार सुरू आहेत. भारतीय रेल्वेने 215 रेल्वे स्थानकांवर 5 हजार 231 डब्बे उपचारासाठी तयार ठेवले आहेत. 85 स्थानकांवर आरोग्य दक्षता पथकेही तैनात केली जातील. यासाठी अडीच हजार डॉक्टर आणि 35 हजार कर्मचारी निश्चित केले असल्याचेही
अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
स्वदेशी निर्मित किटचे चाचणी सुरू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आयुष संजीवनी ऍपच्या माध्यमातून कोरोनावरील आयुर्वेद उपचारासाठी अध्ययन केले जाईल. यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. 21 रूग्णालयात याबाबतचे उपचार होतील, असेही ते म्हणाले.स्वदेशात जलद चाचणी किट तयार केले आहे. लवकरच यावर चाचण्या सुरू केल्या जातील, असा विश्वासही अग्रवाल यांनी व्यक्त केला.
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या जुन आणि जुलै महिन्यात सर्वाधिक होईल, अशी शक्यता ‘एम्स’चे संचालकांनी व्यक्त केली आहे. दक्षात घेणे हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय आहे. रूग्णसंख्या कमी होणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण दोन दिवसांपूर्वी रूग्ण दुप्पट होण्यास 12 दिवसांचा अवधी लागत होता.मात्र एकाच दिवसात मोठय़ा प्रमाणावर रूग्णसंख्या वाढली. त्यामुळे आता पुन्हा 10 दिवसांमध्ये रूग्णसंख्या दुप्पट होत आहेत. एकुण रूग्णांपैकी 4.7 हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. यातील 3.2 टक्के ऑक्सिजनवर आहेत. तर 1.1 टक्के व्हेटिलेटरवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
परराज्यांमधील मजुरांसाठी 222 विशेष ट्रेन
पराराज्यांमधील मजुरांसह विद्यार्थी, पर्यटक आणि भाविक विविध राज्यांमध्ये अडकले होते. त्यांना घरी सोडण्यासाठी आतापर्यंत 222 विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. सुमारे अडीच लाख नागरिकांना याचा लाभ झाला आहे. विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.