कृषी विधेयकांविरोधात आंदोलन : उत्तर भारतात रेल्वे-रस्ता सेवेवर परिणाम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या कृषी विधेयकाविरोधात शुक्रवारी देशभरातील शेतकऱयांनी विविध ठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे रेल्वे व बससेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. पंजाब-हरियाणामध्ये मागील अनेक दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यांचे हे आंदोलन शुक्रवारी अधिक प्रभावीपणे करण्यात आले. भारतीय किसान युनियनसह विविध शेतकरी संघटना ‘भारत बंद’मध्ये सहभागी झाल्या होत्या.
संसदेत संमत करण्यात आलेल्या नव्या कृषी विधेयकांविरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱयांनी ठिकठिकाणी रस्तारोको केला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱयांनी आंदोलन सुरू केल्याने रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असून, पंजाब, हरियाणात या विधेयकांविरोधात तीव्र पडसाद उमटले. शेतकऱयांच्या आंदोलनाचं उग्र रूप लक्षात घेऊन दिल्लीत हरियाणा सीमेलगतची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पंजाबमध्ये गुरुवारपासूनच शेतकऱयांनी रेलरोको आंदोलन सुरू केले होते. शेतकरी कृषी विधेयक मागे घेण्याची मागणी करत आहेत. देशभरातील जवळपास 31 शेतकरी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. शेतकरी संघटनांना काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, अकाली दल, आप, टीएमसीसह अनेक राजकीय पक्षांनी समर्थन दिले आहे. महाराष्ट्रातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील या विधेयकाला विरोध करत आहेत. पंजाब, हरियाणामध्ये खासकरून या विधेयकांना विरोध आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱयांना आवाहन केले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे त्यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने तीन कृषि विधेयकांना शेतकऱयांमधून विरोध वाढताना दिसत आहे. भारत बंदची हाक दिल्यानंतर शुक्रवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. महामार्गावरील वाहतूक रोखत शेतकऱयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. हरियाणा, पंजाबमध्ये शेतकऱयांनी रेल्वेही रोखल्या असून, शेतकरी आंदोलन लक्षात घेऊन अनेक रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-चंदीगढ बससेवा बंद करण्यात आली आहे.
बिहारमध्ये कार्यकर्ते भिडले
बिहारची राजधानी पाटणामध्ये आंदोलनादरम्यान भाजप आणि जन अधिकार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. कृषि विधेयकांच्या विरोधात जेएपीचे कार्यकर्ते पाटणातील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप आणि जेएपी कार्यकर्त्यांमध्ये वाद बाचाबाची झाली. वाद शिगेला जाऊन दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.