ऑनलाईन टीम / मुंबई :
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यापासून अज्ञातवासात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच अटकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना न्यायालयाने केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर असताना दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडी आणि सीबीआयने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. ईडीकडून देशमुख यांना पाचवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. मात्र, देशमुख ईडीपुढे हजर झाले नाहीत. ईडी आणि सीबीआयच्या सर्व समन्सविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेऊन ईडीनं बजावलेले समन्स रद्द करत या कारवाईला स्थगिती आणि अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी याचिकेतून केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला. तसेच कारवाईपासून संरक्षणासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना केली.