प्रतिनिधी / सांगली
भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार पृथ्वीराज देशमुख तर शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक शिंदे-म्हैसाळकर यांची निवड करण्यात आली. येथील खरे मंगल कार्यालयात भाजपा पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. बाबा देसाई यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. दरम्यान, पक्षातील तिरसट माणसांना सांभाळून पक्ष पुढे नेण्याचे काम आ. देशमुख यांनी केले. त्यामुळेच त्यांना पुन्हा संधी देण्यात आली असल्याची टोलेबाजी माजी आमदार विलासराव जगताप यांनी यावेळी बोलताना केली.
यावेळी संघटनमंत्री रवी अनासपुरे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर सौ. संगीता खोत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे, माजी आमदार शिवाजीराव नाईक, दिनकर पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, गोपिचंद पडळकर, सौ. नीता केळकर, संग्रामसिंह देशमुख यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, निवडीनंतर आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले, पक्षातील अंतर्गत वाद मिटले आहेत. गोपिचंद पडळकर आणि संजयकाका यांच्यातील मतभेद आता राहिले नाहीत. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत काही इच्छुकांना न्याय देता आला नाही. मात्र त्यांचाही लवकरच विचार होईल. या पुढील तीन वर्षे निवडणुकीची आहेत. दीपक शिंदे यांनी सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करू अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप यांनी चांगलीच टोलेबाजी केली. ते म्हणाले, जिह्यात पक्षात अनेक तिरसट माणसे आहेत. माझ्यासह पुढे बसलेले खासदार संजयकाका पाटील यांचाही यामध्ये समावेश आहे. अशा माणसांना बरोबर घेऊन पक्ष पुढे नेण्याचे काम पृथ्वीराज देशमुख यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी कितीवेळा हात जोडले असतील त्याचा हिशोब नाही. त्यामुळेच त्यांच्या खांद्यावर पुन्हा पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. दीपक शिंदेही जेष्ठ नेते आहेत. त्यांना कामाची चांगली जाण आहे. संघटनमंत्री रवी अनासपुरे म्हणाले, नागरिकत्व आणि सीएएबाबत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून नागरिकांनी संपर्क साधायचा आहे.
घोरपडे भाजपाच्या व्यासपीठावर
विधानसभा निवडणुकीत हातात शिवबंधन बांधलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजप पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने व्यासपीठावर दिसले. काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीतही त्यांनी भाजपाला साथ दिली होती. त्यामुळे अजितरावांनी शिवबंधन तोडल्याचे स्पष्ट झाले.