पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल : पाकिस्तानच्या कबुलीनाम्यानंतर प्रथमच नोंदवली प्रतिक्रिया
अहमदाबाद / वृत्तसंस्था
विविध विकासकामांचे उद्घाटन करण्याच्या औचित्याने गुजरात दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विरोधकांना कडक शब्दात फटकारले. देशहितविरोधी काम करणारे लोक कधीच आपल्या देशाच्या हिताचा विचार करू शकत नाहीत, असा टोला पंतप्रधानांनी लगावला. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची कबुली दिल्यानंतर प्रथमच त्यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली. काही लोक दहशतवादाचे जाहीर समर्थन करत असून ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशात शनिवारी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. मोदींनी यावेळी सिव्हील सर्व्हिसेस प्रोबेशनर्सना देखील संबोधित केले. पाकिस्तानने पुलवामा हल्ल्याची कबुली दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘आज येथील संचलन पाहताना पुलवामा हल्ल्याचे चित्र डोळय़ासमोर आले. पुलवामा हल्ल्यात मायभूमीचे रक्षक हुतात्मा झाले असताना काही लोक राजकीय स्वार्थ शोधत होते. देशाच्या दु:खात सहभागी होण्याऐवजी त्यांनी केलेली वादग्रस्त विधाने देश विसरू शकत नाही, असे मोदी म्हणाले. देशाला इतकी मोठी जखम झाली असताना काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसले. पण हे सर्व होत असतानाही मी सर्व आरोप झेलले. अनेक वाईट गोष्टी ऐकत राहिलो. माझ्या मनात वीर जवान हुतात्मा झाल्याची जखम होती. पण काही दिवसांपूर्वी शेजारी राष्ट्राने तेथील संसदेत सत्य मान्य करत देशविरोधी लोकांचा खरा चेहरा उघड केला आहे,’ असे मोदींनी स्पष्ट केले. तसेच देशहितासाठी, देशसुरक्षेसाठी, जवानांचे मनोबल कमी व्हावं यासाठी तुम्ही राजकारण करु नका असे सांगत ‘देशहित हेच सर्वोच्च हित’ असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
‘आरोग्य वन’चे उद्घाटन
दोन दिवसांच्या गुजरात दौऱयावर आलेल्या मोदींनी शनिवारी नर्मदा जिल्हय़ात भव्य आरोग्य वनचे उद्घाटन केले. हे आरोग्य वन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ जवळ आहे. या प्रकल्पामध्ये 17 एअर जागेत औषधी रोपांची लागवड करण्यात आली आहे.
देशातील पहिल्या सी-प्लेन सेवेचा शुभारंभ
पंतप्रधान मोदींनी देशातील पहिली सी-प्लेन सेवेचा शुभारंभ केला. देशात सी-प्लेनची सुविधा देणे मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी स्वतः सी-प्लेनने प्रवास केला. सी-प्लेनने दुपारी जवळपास 1 वाजता मोदींना घेऊन केवडियामधून उड्डाण केले आणि जवळपास 1.40 वाजता साबरमती रिव्हर प्रंटवर पोहोचले. गुजरातमध्ये नर्मदा जिल्हय़ाच्या केवडिया ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर प्रंटपर्यंत ही सेवा सुरू झाली आहे. 1,500 रुपये एवढे याचे भाडे ठेवण्यात आले आहे. 200 किमीचे अंतर सी-प्लेनने केवळ 40 मिनिटात पूर्ण होणार आहे. हेच अंतर रस्तामार्गे पार करण्यासाठी जवळपास 4 तास लागतात. सी-प्लेन पाणी आणि जमिनीवर लँड करु शकते. यासाठी रनवेचीही गरज नसते.