चालक आणि मजुरांमुळे देशातील मालवाहतुकीचे प्रमुख साधन म्हणजेच ट्रक रस्त्यांवरून जवळपास गायब आहे. कोरोना विषाणूमुळे देशात टाळेबंदी लागू असल्याने ट्रक ऑपरेटर्सना चालक आणि माल चढविणे आणि उतरविण्यासाठी कामगारांची कमतरता भासत आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने यासंबंधी माहिती दिली आहे. देशभरात एकूण ट्रक्सची संख्या 90 लाख असून यातील केवळ 5 टक्के रस्त्यांवर धावत असल्याने मालवाहतुकीला फटका बसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
गृहमंत्रालयाने टाळेबंदीदरम्यान मालवाहतुकीला अनुमती दिल्यावरही स्थिती सुधारलेली नाही. बहुतांश ट्रकचालक स्वतःच्या घरी परतले आहेत किंवा भोजन आणि वास्तव्य सुविधा मिळणाऱया ठिकाणी ते थांबले आहेत, असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
5 टक्के ट्रक्सच्या माध्यमातून प्रामुख्याने सिलिंडर आणि अन्य पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा केला जात आहे. याचबरोबर कमी अंतरासाठी दूधाचे टँकरही धावत आहेत. तर बाजारपेठेत फळ, भाज्यांची वाहतूक शेतकरी स्वतःच्या वाहनांच्या माध्यमातून करत आहेत. 24 मार्चच्या टाळेबंदीच्या घोषणेपूर्वी अनेक राज्यांनी स्वतःची सीमा बंद केल्याने लाखो ट्रक्स अडकून पडले आहेत.
महामार्गावरील ढाबे बंद असल्याने मोठय़ा संख्येतील ट्रकचालकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली आहे. तसेच मालवाहतुकीसाठी आवश्यक कामगार मिळत नसल्यानेही फटका बसल्याचे संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.