सणासुदीच्या हंगामामुळे गृह मंत्रालयाचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गृह मंत्रालयाने देशव्यापी कोविड निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवले आहेत. सणासुदीच्या काळात कोरोनाचा वाढता धोका विचारात घेऊन कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा मोठय़ा धोक्मयाला आमंत्रण देऊ शकतो, असा इशारा तज्ञांकडून मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना निर्बंध नियमावलीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.
छठपूजा आणि दीपावली सणादरम्यान गर्दी वाढल्यास संसर्ग वेगाने वाढू शकतो. ही भीती गृहीत धरून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे निर्बंध येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवले आहे. गेल्या वषीही सणासुदीच्या काळात कोरोना संसर्ग वाढल्यानंतर बाधितांच्या आकडय़ाने मोठी उसळी घेतली होती. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते.
कोरोनाविरोधातील लढा अजूनही संपलेला नसल्यामुळे युद्ध जोपर्यंत सुरु आहे, तोपर्यंत शस्त्रे खाली ठेवू नका, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवडय़ात दिला होता. त्याच अनुषंगाने आता सणासुदीच्या काळात कोरोनाचे नियम पाळा, मास्क घाला, गर्दी टाळा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. गेल्या दिवाळीपेक्षा यंदाची परिस्थिती चांगली आहे. पण, कोरोना नियमांचे पालन करा. आपल्याला सावध राहायला हवे. निष्काळजीपणा करुन चालणार नसल्याचेही सुचविण्यात आले आहे.
लसीकरण वाढवण्यावर लक्ष कायम
कोरोनाचा प्रादुर्भाव संपवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने लसीकरण मोहीम राबवत आहे. लसीकरण मोहिमेत कोणीही मागे राहू नये, यासाठी केंद्र सरकार आता पुढील महिन्यात ‘हर-घर दस्तक’ (डोअर-टू-डोअर लसीकरण) लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी देशात कोरोनाचे 49 लाख 9 हजार 254 डोस देण्यात आले होते. तसेच देशात आतापर्यंत 104 कोटी 4 लाख 99 हजार 873 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशासह जगभरामध्ये सुरु असलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताने ऐतिहासिक यश मिळवत मागील आठवडय़ातच 100 कोटी डोसचा टप्पा पार केला होता. जानेवारी महिन्यापासून भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली होती.