बंगालमध्ये हिंसक घटना : 25 कोटी कामगार सहभागी झाल्याचा संघटनेचा दावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात बुधवारी देशभरातील विविध दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोलकाता, मुंबई आणि दिल्लीतील औद्योगिक परिसरात बंदचा प्रभाव जाणवला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटनांसह रेल्वेमार्ग बंद पाडल्यामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली होती. तर देशभरातील बँकिंग, वाहतूकसह विविध सेवांवरही बंदचा परिणाम झाला. या देशव्यापी बंदमध्ये सुमारे 25 कोटी कामगार सहभागी झाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.
कामगार आणि नागरिकांच्या विरोधात सरकार निर्णय घेत असून, कामगारांच्या हिताकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. कामगार सुधारणा, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, खासगीकरण, महागाई आणि बेरोजगारी या मुद्यांवरून भारत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 10 केंद्रीय कामगार संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. तर पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगनामध्ये आंदोलनकर्त्यांना रेल्वेमार्ग बंद केल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. केरळमध्ये संघटनांनी संयुक्त मोर्चा काढला होता. बेंगळूर आणि इतर काही ठिकाणी या बंदचा सामान्य जनजीवनावर कोणताच प्रभाव झाला नाही. हैदराबाद विमानतळानजीक सुमारे दोन हजार ऍप बेस्ड पॅब वाहनधारकांनी बंदला समर्थन दिले. दिल्लीत बिघडलेल्या वातावरणामुळे बंदला म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नाही. आंध्रप्रदेशात शहरातील प्रमुख मार्गावरून या बंदच्या समर्थनात रॅली काढण्यात आली होती.
कामगार संघटनांनी विविध बारा मागण्यांसाठी भारत बंदचे आवाहन केले होते. यात बँकिंग, कोळसा, तेल, सुरक्षा, सार्वजनिक आणि परिवहन क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले आहे. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (एटक), हिंद कामगार सभा (एचएमएस), कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) यांच्यासह दहा केंद्रीय संघटना आणि स्वतंत्र संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये या सर्व संघटनांनी 8 जानेवारीला बंद पुकारण्याची घोषणा केली होती.