नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात दररोज आढळणारी रुग्णसंख्या पावणेतीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही वीस लाखांसमीप पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करत असतानाच ‘लॉकडाऊन’ची चर्चाही जोरात सुरू आहे. अशा स्थितीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ‘लॉकडाऊन’च्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यांनी अंतर्गत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन द्वयींनी केले असून देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत फेटाळले आहेत.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सर्व राज्यांमधील परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत. इस्पितळांमध्ये ऑक्सिजन आणि औषधांचा योग्य पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. याव्यतिरिक्त लसीकरण अभियानदेखील वेगाने राबवले जात आहे. देशात सध्या अर्ध्याअधिक राज्यांमध्ये संसर्ग झपाटय़ाने सुरू आहे. दिल्लीसह छत्तिसगड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही मोठी रुग्णवाढ दिसून येत आहे. ही वाढ अशीच होत राहिली तर पुढील आठवडय़ातही या राज्यांमध्ये कोरोनाचा उच्चांक गाठला जाऊन नंतर रुग्णसंख्या कमी होईल, असा दावा तज्ञांकडून केला जात आहे.
मजुरांना विनंती, उद्योग जगताला आश्वासन
दुसऱया लाटेची तीव्रता वाढल्यामुळे यंदाही देशात लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे अनेक राज्यांतून मजूर आपल्या मूळ गावी परतत आहेत. लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याने मजुरांच्या स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. कोरोना साथीच्या काळात फेडरेशन ऑफ इंडियन स्मॉल मीडियम एंटरप्रायजेसचे (एफआयएसएमई) अध्यक्ष सक्सेना यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याशी सरकारच्या धोरणांविषयी चर्चा केली. यावेळी अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन लादण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लहान कंटेनमेंट झोन तयार केले जातील, परंतु देशव्यापी लॉकडाऊन होणार नाही, अशी स्पष्टोक्ती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी भारतीय लघु मध्यम उद्योग महासंघाच्या अध्यक्षांकडे लघु व मध्यम उद्योगांविषयी माहितीही मागविली. एफआयसीसीआयसह देशभरातील अनेक उद्योग आणि व्यापारी संघटनांनी सरकारला देशव्यापी लॉकडाऊन लागू न करण्याची विनंती केली आहे.
‘लॉकडाऊन’बाबत राज्यांना सर्वाधिकार ः शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोरोनासह देशातील विविध मुद्यांवर केंद्र सरकारची भूमिका मांडली. तीन महिन्यांपूर्वीच ‘लॉकडाऊन’संबंधी राज्यांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार केंद्र सरकारने दिले आहेत. राज्यांना लॉकडाऊनसारखे उपाय आपापल्या पातळीवर घ्यावे लागतील, कारण विविध राज्यातील परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे राज्यांनीच स्वतः निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणे योग्य राहील. गेल्या वषी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्राने कोरोनाशी लढा देण्यासाठी मूलभूत सुविधा उभारल्या असल्याचे सांगत शहा यांनी राष्ट्रीय लॉकडाऊनची शक्मयता फेटाळून लावली आहे.
केंद्र कोरोनाविरोधातील लढय़ात कुठेही कमजोर पडलेले नाही. कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणाऱया देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. कोरोनाविरोधी लढाईलाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. तसेच कुंभ असो किंवा रमजान असो कुठेही कोरोनासंदर्भातील नियम पाळल्याचे दिसून आले नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली.