नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशांतर्गत प्रवासी विमानसेवा 25 मे पासून सुरू होईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने व परिस्थितीच्या आकलनानुसार वाढवत नेली जाणार आहे. लॉकडाऊनमुळे 25 मार्चपासून ही सेवा बंद करण्यात आली होती. आता बरेच आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यास अनुमती देण्यात आल्याने विमानसेवाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी केवळ महत्वाच्या मार्गांवर मोजकीच विमाने नेण्यात येतील. अनेक खासगी विमान कंपन्यांनीही त्यांची सेवा 1 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आरक्षण प्रक्रियेलाही प्रारंभ करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.