सांगली/प्रतिनिधी
देशाचे राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे. सध्या धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.
शिराळा येथे शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर भाजपचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यासह पक्ष प्रवेश, वाकुर्डे बुद्रुक व वारणा डावाकालव्यास उपलब्ध केलेल्या ६५४ कोटी निधी बद्दल जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांचा नागरी सत्कार व शेतकरी मिळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते.
कार्यक्रमास जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ,आमदार अरुण लाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, फतेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रसेच तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकध्यक्ष साधना पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, शिराळा हा वेगळा मतदार संघ आहे. योग्य असेल त्यासठी सर्वजन एकत्र येतात. योग्य नसेल तर वेगळी भूमिका घ्यायला मागे पाहत नाहीत. हा या मतदार संघाचा इतिहास आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये या भागातील स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान आहे. शिवाजीराव नाईक यांचे जिल्हापरिषदचे काम चागले होते. चांगले काम करणाऱ्या मोजक्या लोकांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी राजकीय सामाजिक व शैक्षणिक सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. मतदार संघाच्या विकासासाठी आपल्या त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवाजीराव नाईक हे पुन्हा स्वघरी येतायत. त्यांच्या अनुभवाचा उपयोग फक्त सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्रला होणार आहे. देशाचे राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे. सध्या धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. देशासाठी जे रंजलेगांजले त्यांचा मानसन्मान करण्याऐवजी त्यांचा अपमान केला जातो. त्यामुळे सामजिक एकोपा कसा ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली दोन वर्षे सोडता मागील पाच वर्षांत महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचे राजकारण पहावयास मिळाले.
जयंतराव पाटील म्हणाले, शिवाजीराव नाईक यांनी १९९५ पासून कायम राजकीय संघर्ष केला आहे. यश अपयश आले तरी त्यांनी हार न मानता कामात सातत्य ठेवले आहे.त्यांच्या राष्ट्रवादीत येण्याने महाराष्ट्रू त राष्ट्रवादी मोठा पक्ष म्हणून नावारूपास येईल. आम्ही महाराष्ट्रत जेवढ्या जागा लढवू त्यातील जास्ती जास्त जागा निवडून आणू. शिवाजीराव नाईक यांच्या आजच्या पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या पक्ष प्रवेशाचा परिणाम २०२४ ला दिसून येईल. तसेच फत्तेसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांचे स्वप्न असलेली वाकुर्डे योजना पूर्ण करणारं.
माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, १९९५ ला पक्षाने नाकरले पण लोकांनी त्यावेळी निवडणूक हाती घेवून तालुक्यात क्रांती घडवली. १९९९ आम्ही एकत्र काम केले. त्यांतर जरी दुरावा झाला असला तरी पुन्हा आम्ही एकत्र आलो आहे. चांदोली पर्यटन विकास व वाकुर्डे योजना यांची कामे गतीने पूर्णत्वास यावी हाच आमचा ध्यास आहे.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शिवाजीराव नाईक यांनी मोठा राजकीय संघर्ष केला आहे.त्यांच्या कडून मी राजकारण शिकलो आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीने राष्ट्रवादी प्रवेशाने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल. शिवाजीराव देशमुख यांनी अखेर पर्यंत काँग्रेसची एकनिष्ठता जोपासली.त्यांनी या मतदारसंघातील लोकांचे कायम हित जोपासले.