पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘भगवद्गीता’ प्रकाशन कार्यक्रमात प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात संपत्तीची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होऊन त्यायोगे देशाचे वैभव वाढावे आणि देशात मानवीमूल्ये संवर्धित व्हावीत, यासाठीच आत्मनिर्भरतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते स्वामी चिद्भवानंद यांच्या डिजिटल भगवद्गीचे गुरूवारी प्रकाशन करीत होते.
आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारत केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर जगासाठीही उपयुक्त आहे. याचा प्रत्यय कोरोना काळात आलेलाच आहे. भारताने मोठय़ा प्रमाणावर कोरोना विराधी लसीची निर्मिती केली. आवश्यकता असताना ती साऱया जगाला पुरविली. संयुक्त राष्ट्र संघानेही भारताचे या संदर्भात कौतुक केले. हेच आत्मनिर्भरतेच्या मंत्राचे सामर्थ्य आहे. भगवद्गीतेचा कर्मयोगाचा सिद्धांत आत्मनिर्भरतेचा पाया आहे, अशा अर्थाचे उद्गार त्यांनी काढले.
भगवद्गीतेचा संदेश उपयुक्त
भारतात मोठय़ा प्रमाणात संपत्ती आणि संसाधनांची निर्मिती झाली तर त्यांचा लाभ जगालाही होणार आहे. यासाठी आपण संकटाचे रूपांतर संधीत केले पाहिजे. भगवद्गीता ही युद्धासारख्या संघर्षातच निर्माण झाली. सध्याची परिस्थितीही तशाच प्रकारची आहे. मानवता आज एका संघर्षमय वातावरणातून प्रवास करीत आहे. एका नव्या विषाणूशी आपण युद्ध करीत आहोत, अशा स्थितीत मनःस्वाथ्य टिकविण्यासाठी आणि कार्यप्रवण होण्यासाठी भगवद्गीतेचा संदेश निःसंशयपणे आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
वैशिष्टय़ांनी भरलेला गंथ
भगवद्गीता हा बहुविध वैशिष्टय़ांनी भरलेला गंथ आहे. सर्वसामान्य माणसांसाठी त्यात व्यवहारी तत्वज्ञाना सांगण्यात आले आहे. वैचारिक समृद्धता, बहुविधता आणि लवचिकता या सर्व निकषांवर हा ग्रंथ अतुलनीय ठरतो. सदर ई-गंथात भगवद्गीतेची सर्व वैशिष्टय़े नेमकेपणाने सांगण्यात आली असून ती सर्वांना उपयुक्त ठरतील, अशी या ग्रंथाची भलावण त्यांनी केली.