ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीनमधील तणाव वाढत असला तरी आज भारत एवढा सक्षम आहे की, भारताच्या एक इंच जमिनीवरही कोणी वाकडी नजर टाकू शकत नाही. त्यामुळे देशवासियांनी निश्चिंत रहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
मोदींनी आज लडाख सीमावादावर भाष्य केले. मोदी म्हणाले, नव्या पायाभूत सोयीसुविधांमुळे नियंत्रण रेषेजवळील क्षेत्रात देखरेख करण्याची आपली क्षमताही वाढली आहे. देखरेखीची क्षमता वाढली असल्याने आपण अधिक सतर्कही झालो आहोत आणि नियंत्रण रेषेजवळील क्षेत्रात होणाऱ्या घडामोडीही वेळेत कळू लागल्या आहेत. आपले जवान पावलोपावली आहेत. त्यामुळे देशवासियांनी निश्चिंत रहावे, असे मोदींनी म्हटले आहे.
मागील महिनाभरापासून पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यातच 15 आणि 16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले तर चीनचे 43 सैनिक मारले गेले. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे.