ऑनलाईन टीम / पुणे :
देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्या वतीने आयोजित उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान समारंभ आज सर परशुराम महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला, यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
कार्यक्रमात शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. देविदास वायदंडे आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. सोनाली परचुरे यांना तर पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयास उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार देवून राज्यपाल श्री कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ‘इडूसर्च’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात चर्चा करताना नवे संशोधन आणि प्रशिक्षण यांची ज्याप्रमाणे आवश्यकता आहे त्याप्रमाणेच चांगला मानवी दृष्टीकोन निर्माण करण्याचीही आवश्यकता आहे. शैक्षणिक क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे, देशाच्या उभारणीत नेतृत्व करण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोश्यारी पुढे म्हणाले, कोणतेही काम छोटे नसते, प्रत्येक कार्यातून काही तरी चांगले निश्चितच घडत असते. शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राची सुरवात चार प्राध्यापकांनी केली, आज चारही दिशांना या संस्थेचे कार्य पोहचले आहे. शैक्षणिक व्याप्ती वाढल्याचे समाधान व्यक्त करून शिक्षण हा आपल्या आवडीचा विषय असल्याचे सांगत उत्तराखंड येथे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी देशात आहेत, यामध्ये तेथील शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे, शिक्षकांच्या योगदानाने देशाचे उज्ज्वल भवितव्य घडेल, असा विश्वासही राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.