मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली की, मागच्या दोन आठवड्याशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र अद्यापही 24 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. ही कोरोनाची वाढ कमी करणे हे टार्गेट आहे. यासोबतच देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी राजेश टोपे म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. आज दिवसभरात आत्तापर्यंत राज्यात 48 हजार 621रुग्ण सापडले असताना तब्बल59 हजार 500रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे भारताच्या सरासरी रिकव्हरी रेटपेक्षा जास्त असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 27टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे 5 टक्क्यांनी ही घट दिसत आहे. आपण चाचण्या कुठेही कमी केलेल्या नाहीत. 2.5 लाख ते 2.8लाख टेस्ट प्रतिदिन आपण करत आहोत. जवळपास 65टक्के चाचण्या या आरटीपीसीआर आहेत. अनेक राज्य 90 टक्के अँटिजेन टेस्ट करत आहेत. उत्तर प्रदेशातही ते होतंय. प्रति 10 लाख लोकसंख्येमागे 2 लाख चाचण्या आपण करत आहोत. रुग्णसंख्या, मृत्यू कमी होत आहेत. गेल्या 3 आठवड्यात डिस्चार्ज रेट 48 हजार 621रुग्ण सापडले आहेत, तर डिस्चार्ज 59 हजार 500 पर्यंत गेली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 84.07टक्के झाला आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 81 टक्के असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, राज्यात निर्माण झालेल्या लस तुटवड्यामध्ये केंद्र सरकारकडून 45 पुढच्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कोविशिल्ड लसीचे 9 लाख डोस आल्याचं टोपेंनी यावेळी सांगितलं. 45 पासून पुढच्या वयोगटासाठी कालपर्यंत 25-30 हजार लसीचे डोस पूर्ण महाराष्ट्रात होते. म्हणून आपल्याला बऱ्याच ठिकाणी लसीकरण थांबवावं लागलं. मात्र, आत्ता 9लाख डोस आपल्याकडे आले आहेत. पण हा देखील दोन दिवसांसाठीचाच कोटा आहे. 45 वर्षांवरच्या एकूण साडेतीन कोटी लोकांपैकी 1 कोटी 65 लाख लोकांना आपण लस दिली आहे. अजून साधारणपणे 50 टक्के लोकांना लस द्यायची आहे. देशात 4 ते 5 राज्यांनी 1 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू केलं. त्यात महाराष्ट्र देखील आहे. प्रत्येक जिल्ह्यात 5 केंद्रांवर हे लसीकरण आपण केलं आहे. त्यानुसार या वयोगटातल्या 1 लाख लोकांना आपण लस दिली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.