प्रतिनिधी / कुरुंदवाड
या देशातील किंवा परदेशातील कोणत्याही माणसाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना होऊ शकणार नाही. इतके त्यांचे जीवन मनोवेधक, अलौकिक, अनेकविध आणि अद्भुत होते. स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी कायद्याचे अस्त्र वापरले स्वतःचे सर्व पांडित्य त्यांनी स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी पणाला लावले त्यामुळेच आज स्त्री केंद्रित बनली आहे. असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रसन्न दिगंबर कुलकर्णी यांनी केले. येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी होते.
ते पुढे म्हणाले की, विसाव्या शतकातील मानवमुक्तीचा दाता म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगाने नोंद घेतली. त्यांचे अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीतील योगदान अलौकिक आहे. सामाजिक संघर्ष राजकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडलेच नसते तर ते जागतिक पातळीवर एक ख्यातनाम आणि आंतरराष्ट्रीय मान्यतेचे अर्थशास्त्र म्हणूनच ओळखले गेले असते. त्यांची सर्व शैक्षणिक जडणघडण अर्थशास्त्राचे, भारतीय आर्थिक प्रश्नाचे विचक्षण अभ्यासक म्हणून झाली. देशाच्या विकासाच्या सर्व टप्प्यांमध्ये आणि योजनांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी कायद्याचे अस्त्र वापरले स्वतःचे सर्व पांडित्य त्यांनी स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी पणाला लावले स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी जुन्या कायद्याची संहिता बदलली पाहिजे व ती स्त्री केंद्रित बनली पाहिजे हा बाबासाहेब यांचा हेतू होता. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी यांनी केले. प्रसन्न कुलकर्णी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेवटी आभार पर्यवेक्षक विजय कुलकर्णी यांनी मानले.
या कार्यक्रमाला नंदकुमार सुतार, श्रीकांत निकाळजे, सदाशिव तिगणे. प्रकाश चाटे, रघुनाथ माळी, बाबासाहेब भुजूगडे, सतीश माने, सच्चिदानंद जंगम, राहुल जंगम, गोपाळराव जोशी, विजय शहापुरे, चंद्रशेखर मोरे, सुधाकर कांबळे, हेमलता माळी, दत्तात्रय वाघमोडे, गजानन केरीपाळे प्रकाश ढाले, दत्ता धुमाळे, सोमनाथ जंगम या मान्यवरांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी हजर होते.