2018 सालच्या व्याघ्र गणनेनुसार भारतात 2,967 पट्टेरी वाघ असल्याचे स्पष्ट झालेले आहे. जगातले सुमारे 75 टक्के वाघ आपल्या देशात असून भारतीय धर्म आणि संस्कृतीत वाघाला एकेकाळी देवतास्वरुप मानले होते. भारताच्या 1,21,337 चौ.कि.मी. क्षेत्रफळातल्या 26,838 ठिकाणी व्याघ्रगणना राबविण्यात आली होती. 1947 सालच्या आकडेवारीनुसार भारतात 40 हजारांच्या आसपास वाघांची संख्या होती. 1972 सालच्या पहिल्या व्याघ्रगणनेत देशभरात 1,827 वाघ शिल्लक राहिल्याचे स्पष्ट झाल्याने तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करून व्याघ्र राखीव क्षेत्राच्या निर्मितीस प्राधान्य दिले परंतु असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून मानव आणि वाघ यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षापायी दरवर्षी शिकार, विषबाधा याद्वारे वाघांचे बळी घेण्याचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. वाघांची कातडी, नखे, दात, मांस यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्याने त्यांची शिकार करण्याची अघोरी कृत्ये उद्भवत असतात. 2009 ते 2020 या कालखंडात गोव्यासारख्या छोटय़ा राज्यात पाच वाघांच्या निर्घृणपणे करण्यात आलेल्या शिकारीची प्रकरणे देशभरातल्या एकंदर वाघांच्या सद्यस्थितीची कल्पना देते.
भारतात वाघांची शिकार शेकडो वर्षांपासून करण्यात येते. वाघाला ठार करणे हे शौर्यवंतांचे लक्षण मानले जाते. गोवा, कोकण आणि घाटावरती सत्तास्थानी असलेल्या कदंब नृपती गुहल्लदेव तृतीय याने वाघाला ठार केल्यानंतर ‘व्याघ्रमारी’ हे बिरुद धारण केले होते. सत्तरीतील झरमे गावातल्या पूरावचाराच्या मंदिराच्या शिलापट्टय़ात ‘व्याघ्रमारी’चे लक्षवेधक चित्र आहे. दिल्ली गादीवर ती विराजमान
झालेल्या सुर राजघराण्यातला पराक्रम सुलतान वाघाला ठार केल्याकारणाने शेरशहा म्हणून नावारुपास आला होता. म्हैसूर संस्थानातला ब्रिटेशांविरुद्ध लढणारा वाघ म्हणून पुढे टिपू सुलतान ओळखला गेला. आज जागतिक स्तरावरती महानगरी समजल्या जाणाऱया मुंबईत 1929 पर्यंत वाघांचे वास्तव्य होते. दक्षिण भारतात चेन्नई हे पूर्वी व्याघ्रनगर म्हणून तामिळ भाषेत पूलीयूर नावाने परिचित होते. हत्तीवर विराजमान होऊन वाघांची शिकार करण्याचा शौक मुगल सम्राट अकबरामुळे प्रसिद्धीस आला. आपल्या कारकिर्दीत 86 वाघांची शिकार करणाऱया जहाँगीर बादशहाने आपल्या आत्मचरित्रात वाघांविषयीची निरीक्षणे नोंदवली होती. 1757 सालच्या प्लासीच्या युद्धाच्या विजयश्रीनंतर ब्रिटिशांनी वाघांची शिकार करण्याची परंपरा रूढ केल्याकारणाने देशभरात वाघांची शिकार करण्याचे कृत्य गौरवास्पद बाब समजली गेली. मध्य भारतातल्या रेवा संस्थानाच्या राजाला शिकारीचा भारी शौक असल्याने, त्यांनी 109 वाघांची शिकार केल्याची नोंद आहे. ब्रिटीश गव्हर्नर लिन्लीथगोव यांनी आपल्या शिकारीच्या नादापायी नेपाळच्या जंगल परिसरात 120 वाघांचा बळी घेतला होता. राजस्थानातल्या उदयपूरच्या संस्थानिकाने तर एक हजार वाघांची शिकार केल्याची नोंद आहे. भारतात सगळय़ात ज्यादा वाघांची शिकार सुरगुजा संस्थानाच्या महान राजाच्या नावे आहे. त्यांनी आपल्या शिकारीच्या छंदामुळे सुमारे 1,100 वाघांचा बळी घेतल्याचे सांगण्यात येते. भारतदेशात आज जीम कॉर्बेट यांच्या नावे राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केलेली आहे. उत्तराखंडात जन्माला आलेल्या एडवर्ड जेम्स कॉर्बेट हा ब्रिटिश भारतीय सैन्यदलात कर्नलपदी असताना तर भक्षक झालेल्या वाघांची यशस्वीपणे शिकार केली होती. 1,200 व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या 436 नरभक्षकांची त्यांनी आपल्या कारकिर्दीत शिकार केली होती. नरभक्षक वाघांची निधडय़ा छातीने शिकार करणाऱया जीम कॉर्बेट यांनी आपल्या स्वानुभवावरती विपुल लिखाण करून निसर्ग आणि पर्यावरणाची भावना वृद्धिंगत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यासाठी आशिया खंडात पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून 1936 साली नावारुपास आलेल्या जंगल प्रदेशाचे 1956 साली जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामकरण केले.
उत्तराखंडातल्या नैनितालच्या 520 चौरस किलोमीटर क्षेत्रफळातले हे उद्यान पट्टेरी वाघांसाठी पूर्वीपासून आजतागायत ख्यातनाम आहे. बंगालच्या फाळणीस कारणीभूत ठरलेल्या लॉर्ड कर्झन याने ग्वालियर, रेवा, हैदराबाद आणि कुचबिहार संस्थानातल्या वाघांची हत्या करून आपल्या शिकारीचा शौक पुरा करून घेतला होता. लेफ्टनंट विलियम राईस यांनी भारतातल्या वाघांच्या शिकारीसंदर्भात 1857 साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात आपल्या पराक्रमाची गाथा सांगितलेली आहे. बंगाल सैन्याचा कप्तान हेन्री शेक्सपिअरने ब्रिटिश सैन्याला मदिरा आणि मदिराक्षीच्या नादापासून दूर ठेवण्यासाठी वाघाच्या शिकारीला क्रीडाप्रकार म्हणून मानले होते. ब्रिटिश राज्यपाल, सैन्याधिकारी, प्रशासकीय अधिकाऱयांचा शौक भारतीय राजे, सरदार यांनी आपल्या अंगी भिनवला होता आणि त्या शौकापायी भारतीय जंगलाच्या राजाची निर्घृणपणे सातत्याने शिकार करून त्याला इतिहासजमा होण्याच्या वाटेवरती नेले होते. 1972 साली भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा आपल्या देशात लागू करण्यात आल नसता आणि वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्प राबविण्यात आला नसता तर पट्टेरी वाघ आपल्या देशातून चित्त्यासारखा नामशेष झाला असता. एकेकाळी वाघ हा भारतीय उपखंडाचे नैसर्गिक वैभवाचे संचित होता परंतु आज पट्टेरी वाघांचा अधिवास, अन्नस्रोत तसेच जलाशयाचे अस्तित्व दुरापास्त झालेले असल्याकारणाने त्यांचे अस्तित्व आगामी काळात आणखी दुर्बल होऊन मानव-वाघ यांच्यातला संर्घष जीवघेणा होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय विश्व प्रकृती निधीनुसार आज जगभर 3,900 वाघ शिल्लक राहिलेले आहेत. दिवसेंदिवस महाराष्ट्रातल्या चंद्रपूरसारख्या जंगल प्रदेशात वाघ आणि स्थानिक यांच्यातला संघर्ष धोकादायक वळणावर येऊन पोहोचलेला आहे. वाघ हे भारतीय निसर्गातले सौंदर्य, धाडस, सामर्थ्य आणि राष्ट्रीयत्व यांचे प्रतीक आहे. 2010 साली रशियातल्या सेंट पिटर्सबर्ग येथील व्याघ्रशिखर परिषदेत जगभरात झपाटय़ाने कमी होणाऱया वाघांच्या संख्येबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. याविषयी जागृती व्हावी म्हणून दरवर्षी 29 जुलै हा आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. व्याघ्र राखीव क्षेत्र अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानासारख्या त्यांच्या हक्काच्या नैसर्गिक अधिवासातही त्यांचे जगणे कठीण झालेले आहे. वाघाचे मांस, कातडी, नखे, हाडे, दात यासारख्या घटकांनी मोठय़ा प्रमाणात मागणी वाढत असल्याकारणाने कायदेशीररित्या वाघांच्या शिकारीवरती बंदी असताना, त्यांची शिकार पूर्णपणे रोखणे वनखात्याला प्रतिकूल झालेले आहे. पाव शतकापूर्वी भारतातील पश्चिम घाटातले जंगल हे वाघाचे भविष्यातले आश्रयस्थान असल्याचे म्हटले होते आणि त्यासाठी व्याघ्र संवर्धनाद्वारे पेयजल आणि प्राणी निर्मितीस चालना लाभत असल्याचे अधोरेखित केले होते. व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणाद्वारे आपल्या देशातला निसर्ग आणि पर्यावरण समृद्ध होणे शक्य आहे.
राजेंद्र पां. केरकर