ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मार्च 2020 अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 3.4 टक्क्यांनी वाढून ती 74.3 कोटींवर पोहचली आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) अहवालानुसार, रिलायन्स जिओने मार्च 2020 अखेर संपलेल्या तिमाहीत 52.3 टक्के बाजारहिस्स्यासह प्रथम क्रमांक पटकावला, तर भारती एअरटेल 23.6 टक्के हिस्स्यासह दुसऱ्या क्रमांकावर होती. या कालावधीत व्होडाफोन आयडिया तिसऱ्या क्रमांकावर होती. इंटरनेट ग्राहकसंख्येच्या आधारावर त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा 18.7 टक्के होता.
डिसेंबर 2019 अखेर संपलेल्या तिमाहीत इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 71.8 कोटी होती, जी मार्च 2020 मध्ये 3.40 टक्क्यांनी वाढून 74.3 कोटी झाली. वायरलेस इंटरनेट ग्राहकांची संख्या 72.7 कोटी होती, जी एकूण इंटरनेट ग्राहकांपैकी 97 टक्के आहे. वायरसह इंटरनेटचा वापर करून ग्राहकांची संख्या 2.24 कोटी होती.