एका दिवसात 17 हजार 296 नवे रूग्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात मागील 24 तासांमध्ये 17 हजार 296 नवे रुग्ण आढळले. तर 407 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या 4 लाख 90 हजार 401 झाली आहे. 1 लाख 89 हजार 463 जणांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 2 लाख 85 हजार 637 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत मृतांची संख्या 15 हजार 301 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, केंद्रीय पथकाने सर्वात जास्त बाधित राज्यांमध्ये समावेश असणाऱया गुजरातचा दौरा केला. तर पश्चिम बंगाल सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय सहसचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने शुक्रवारी गुजरातची पाहणी केली. पथकाने सर्वाधिक बाधित घाटलोदिया क्षेत्राचा दौरा केला. तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱयांबरोबर चर्चा केली. देशातील काही राज्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणाचा समावेश आहे. येथील परिस्थितीची आढावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथकाने या राज्यांचा दौरा सुरू केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील आरोग्यविषयक समन्वय अधिक वाढण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, देशात 25 जूनपर्यंत 77 लाख 76 हजार 228 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या तर. आता दररोज सरासरी 2 लाख रुग्णांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती ‘आयसीएमआर’च्या सूत्रांनी दिली.
पश्चिम बंगालमधील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवले
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पहाटे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत लॉकडाऊन नियमात शिथिलता असेल. 1 जुलैपासून कोलकातामध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित बीएसएफ जवानांची संख्या 868 वर
सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) कोरोनाबाधित जवानांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आतापर्यंत 868 जवान बाधित झाले आहेत. यातील 245 जवानांवर उपचार सुरू आहेत. तर 618 जण बरे झाले आहेत. आतापर्यंत 5 जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती ‘बीएसएफ’मधील सूत्रांनी दिली.
सध्या तरी काळजी घेणे हाच उपाय : पंतप्रधान
कोरोना विषाणू संसर्गावर लस येईपर्यंत सर्वांनी मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.