नागालँडमध्ये खोनोमा गावाला मिळाला मान : एकही झाड तोडले न जाणारे गाव
भारतातील 65 टक्के लोकसंख्या अद्याप गावांमध्ये वास्तव्य करून आहे. देशात अशी अनेक गावे आहेत, जी विकासाचा मार्ग दाखवून देत आहेत. असेच एक गाव नागालँडमधील खोनोमा आहे. कधीकाही ब्रिटिश वसाहतवादी शासनाच्या विरोधात स्वातंत्र्ययुद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया खोनोमा गावाची एक वेगळी ओळख असून ती पूर्ण देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. हे गाव कोहिमापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात गेल्यास चहुबाजूला हिरवाईच दिसून येईल. हे भारतातील पहिले ग्रीज व्हिलेज आहे.
या गावात अंगामी आदिवासी समुदायाच्या लोकांची संख्या अधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार येथे एकूण 424 कुटुंबांचे वास्तव्य असून एकूण लोकसंख्या 1,943 इतकी आहे. हा आदिवासी समुदाय स्वतःचे शौर्य आणि मार्शल आर्ट्ससाठी ओळखला जातो.
प्राण्यांच्या शिकारीवर बंदी
700 वर्षे जुन्या या गावातील लोक पूर्वी शिकार करायचे. परंतु 1998 मध्ये खोनोमाच्या लोकांनी स्वतःवर शिकार करण्यास बंदी घेतली आहे. शिकारीमुळे नेक प्राणी-पक्षी विलुप्त होण्याच्या मार्गावर पोहोचल्याने त्यांनी अशाप्रकारचे पाऊल उचलले होते. तेव्हापासून खोनोमा गावाला पर्यावरण संरक्षण गाव म्हणूनही ओळखले जाते.
वृक्षतोडीपासून दूर
खोनोमा गावातील लोक स्वतःचा सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाचा वरदान जपून ठेवू इच्छितात. याचमुळे त्यांनी स्वतःला संरक्षित करण्यासाठी नियम तयार केले आहेत. येथे वृक्षतोड केली जात नाही. जर कुणाला लाकडापासून काही तयार करायचे असल्यास तो पूर्ण झाड नव्हे तर केवळ फांद्या तोडतो. या गावात शेतीचे प्रमाण खूपच कमी आहे. तर काही लोक झूम शेती करतात.
सद्यकाळात खोनोमा ग्रामस्थ सक्रीय स्वरुपात वृक्ष आणि प्राण्यांचे संरक्षण करत आहेत. आता तेथे मोठय़ा संख्येत पर्यटक दाखल होत आहेत. येथील लोक अभिमानाने स्वतःच्या गावाबद्दल बोलत असतात.