ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सद्य स्थितीत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे, असे असले तरी हे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एक मोठे वक्तव्य केले आहे.
जेव्हा कधी कोरोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी हा दावा केला.
ते म्हणाले, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वेळेवर महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश मिळाले आहे. लॉकडाऊन लागू करणे आणि नंतर अनलॉक करण्याची वेळही योग्यच होती, असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, कोरोणाचे संकट अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वांना सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषतः सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे अशावेळी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही वेळ नाही, असेही त्यांनी नमूद केलं.
केंद्र सरकारकडून कोरोना लस संपूर्ण देशामध्ये त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार सरकारने सुरूवातीच्या टप्प्यात सर्व देशवासीयांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी 50 हजार कोटी रूपयांपर्यंतची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्यासाठी जवळपास 385 रूपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. असा अंदाज सरकारी पॅनलकडून देण्यात आला आहे.