अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी : सरकारची भूमिका नकारात्मक
वृत्तसंस्था/ जयपूर
देशातील बँकिंग क्षेत्र दबावाखाली असून, सरकार त्यांना प्रोत्साहन पॅकेज देऊन संकटातून बाहेर काढण्याच्या मनस्थितीत नाही, असे नोबेल पुरस्काराने सन्मानित अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे. जयपूर साहित्य महोत्सवादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. वाहन क्षेत्रातील मागणीमधील नरमपणा यावरूनच चित्र स्पष्ट होते की, लोकांमध्ये अर्थव्यवस्थेवर विश्वास नाही, असेही ते म्हणाले.
आर्थिक क्षेत्र सर्वात मोठे दबावाखालील केंद्र आहे. बँकिंग क्षेत्र दबावात आहे हीच चिंतेची बाब आहे. वास्तविक सरकार त्यांना प्रोत्साहन पॅकेज देऊन संकटातून बाहेर काढण्याच्या मनस्थितीत नाही. अर्थव्यवस्थेतील मागणीमध्ये घट झाल्यामुळे कार आणि दुचाकी वाहनांची विक्री होत नाही. हे सर्व संकेत आहेत की, लोकांना अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने होणाऱया वृद्धीच्या अंदाजावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे ते खर्च करत नाहीत, असेही बनर्जी यांनी स्पष्ट केले.
दारिद्रय़ निर्मूलनावर परिणाम
अर्थव्यवस्थेमधील नरमपणामुळे देशातील दारिद्रय़ निर्मूलनावर प्रतिकूल प्रभाव पडेल, कारण शहरी आणि ग्रामीण क्षेत्र एकमेकांशी जोडले गेले आहे, असे ‘गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाईम’च्या लेखकाने म्हटले आहे. शहरी क्षेत्रातून कमी कौशल्याचे रोजगार उपलब्ध होतात. ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना तेथे रोजगार मिळून शहरातील पैसा ग्रामीण भागात जातो. मात्र, शहरी क्षेत्रात रोजगार मिळत नसल्यामुळे याचा परिणाम ग्रामीण क्षेत्रावर होत आहे.