24 तासात आढळले 3.62 लाख नवे रुग्ण; मृतांचा आकडा 4 हजारांपेक्षा जास्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ झाल्याचे गुरुवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, अर्ध्या-अधिक राज्यांमधील स्थिती सुधारत असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याने दिलासा मिळत आहे. दरम्यान, एका दिवसात देशात 19 लाख 83 हजार 804 जणांची चाचणी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत 17 कोटीहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दररोज कमी-जास्त होत असल्याने आरोग्य यंत्रणांसमोरील समस्या वाढली आहे. देशात गेल्या 24 तासात नव्या बाधितांमध्ये पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 727 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 52 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4 हजार 120 रुग्णांचा मृत्यू झाला. सलग दुसऱया दिवशी 4 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2 कोटी 37 लाख 3 हजार 665 इतके लोक आले आहेत. यापैकी 1 कोटी 97 लाख 34 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मागील काही दिवसांपासून दररोज सरासरी 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण रिकव्हर होत आहेत. डिस्चार्जची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्येवरही नियंत्रण आले आहे. आता देशात 37 लाख 10 हजार 525 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
भारतात गुरुवारी एकूण मृत्यूसंख्या 4 हजार 120 इतकी नोंदली गेली. बुधवारच्या तुलनेत नवे रुग्ण वाढले असले तरी मृत्यूसंख्येत मात्र घट झाले आहे. मृत्यूंचा एकूण आकडा आता 2 लाख 58 हजारपर्यंत पोहचला आहे. अमेरिका, ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
18 राज्यात रुग्णवाढीचा दर 20 टक्क्मयांहून अधिक
देशातील 18 राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर हा 20 टक्क्याहून अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील 12 राज्यात 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 8 राज्यांमध्ये 50 हजार ते 1 लाखादरम्यान सक्रिय रुग्णसंख्या आहे. तर 16 राज्यांमध्ये 50 हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. तर 187 जिल्हय़ांमध्ये मागच्या दोन आठवडय़ात रुग्णसंख्या कमालीची घटल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना रुग्णवाढीचा दर 15 टक्क्याहून अधिक आहे. 8 राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर 5 ते 15 टक्के आहे. तर 4 राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर 5 टक्क्मयांहून कमी आहे.