कोरोना प्रसाराचा वेग मंदावला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोरोना रूग्णसंख्या दुप्पट होण्यास आता दहा दिवसांचा कालावधी लागत आहे. रूग्ण बरे होण्याचा टक्काही 20. 52 इतका झाला आहे. मागील चौवीस तासांमध्ये 491 रूग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाल्याने एकुण बरे झालेलया रूग्णांची संख्या 4 हजार 748 झाली आहे. मागील 14 दिवसांमध्ये 80 जिल्हय़ांत तर 15 जिल्हय़ांत गेल्या 28 दिवसांमध्ये एकही नवा रूग्ण आढळलेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली. मागील चौवीस तासांमध्ये कोरोनाचे 1684 नवे रूग्ण आढळले असून देशातील एकुण रूग्णसंख्या 23 हजार 77 इतकी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनपूर्वी देशात 5.2 दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट होत असे. लॉकडाऊनच्या दुसऱया आठवडय़ात पुन्हा रूग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ झाली 4.2 दिवसांनी रूग्णसंख्या दुप्पट होत होती. 17 एप्रिलपर्यंत 6.2 दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे स्पष्ट झाले. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले. त्याचा प्रसाराचा वेग कमी झाला आहे. लॉकडाऊन केले नसते तर आज आपल्या देशाचे मोठे नुकसान झाले असते. आता दहा दिवसांनी रूग्णसंख्येत दुप्पट वाढ होत आहे, असेही अग्रवाल म्हणाले.
सद्यस्थितीत देशातील नागरिकांनी आपल्या व्यवहारांमध्ये बदल केलाय. गावापासून शहरापर्यंत कोरोना हरविण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. नागरिकांचा सकारात्मक विचार आणि स्वयंशिस्त हेच कोरोना प्रसार रोखण्याचे मुख्य कारण आहे. कोरोनाशी मुकाबला करत जनजीवन पूर्वपदावर कसे आणावे, यासाठी धोरण ठरवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व राज्यांमध्ये सर्वेक्षणांचे काम सुरू
28 राज्यांसह 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. या माध्यमातून रूग्णांबाबतची माहिती मिळण्यास मदत होत आहे. तसेच रूग्ण आढळल्यास त्याला तत्काळ उपचार दिले जात आहेत, असेही अग्रवाल म्हणाले.
गृहमंत्रालयाच्या आदेशातून गैरसमज
कोरोना रूग्णसंख्या कमी असणाऱया ठिकाणी लॉकडाऊनमध्ये काही सवलत देण्यात आल्या होत्या. मात्र कारखान्यांमधील कामगार कोरोनाबाधित झाल्यास मालकास शिक्षा होईल, असा गैरसमज पसरला. असा कोणताही आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेला नाही. याबाबतची माहिती सर्व राज्यांना दिली आहे. राज्यातील सवलतीबाबतच्या सूचना आणि नियमाची योग माहिती द्यावी, असे गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले. कोरोनाचे हॉटस्पॉट नसणाऱयांना जिल्हय़ांना लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली आहे, असा पुन्नरूच्चारही त्यांनी केला.
मंत्रालयालची आणखी चार पथके
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाच्या सहा पथके स्थापन केली होती. सूरत, अहमदाबाद, चेन्नई आणि हैदराबादमधील परिस्थितीची पाहणीसाठी शुक्रवारी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहेत.