वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात चौवीस तासांमध्ये बुधवारी 6 हजार 387 नवे रूग्ण आढळले. तर 170 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळपर्यंत एकुण रूग्णसंख्या 1 लाख 53 हजार 191 इतकी झाली. राजधानी दिल्लीतही कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. येथे नवे 792 रूग्ण आढळले. ही आजवरची एका दिवसातील सर्वाधिक रूग्णसंख्या ठरल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
देशभरात रूग्णसंख्या वाढत असली तरी रूग्ण बरे होण्याचा टक्काही वाढला आहे. आता 47 टक्के रूग्ण बरे होत आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात केवळ सात टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण होते, असे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीत 24 तासात 792 नवे रूग्ण
दिल्लीमध्ये मागील 24 तासात नवे 792 रूग्ण आढळले आहेत. यामुळे येथील रूग्णसंख्या 15 हजार 257 झाली आहे. आतापर्यंत 303 जणांचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये 30 जूनपर्यंत शाळा, कॉलेज बंदच राहणार
पश्चिम बंगालमध्ये 30 जूनपर्यंत शाळा व कॉलेज बंदच राहतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मुंबईहून कोलकाताला 36 श्रमिक एक्सप्रेस सोडण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही, असा आराप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. रेल्वे मंत्रालय स्वत:च सर्व नियोजन करीत आहे. राज्य सरकारला विश्वासात घेतले जात नाही, असेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंत 3500 श्रमिक ट्रेनने कामगारांना पोहचवले
आतापर्यंत देशभरात 3500 श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या. यामुळे 48 लाखहून अधिक कामगार त्यांच्या घरी गेले आहेत. यातील 80 टक्के रेल्वे या उत्तर प्रदेश आणि बिहारला सोडण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने बुधवारी सांगितले.
धार्मिक स्थळे उघडण्याची कर्नाटकने मागितली परवानगी
राज्यातील सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडियुराप्पा यांनी केली आहे. यासंदर्भात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसारच राज्य सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘वंदेभारत’च्या माध्यमातून 30 हजार भारतीयांना मायदेशी आणले
विदेशात अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्र सरकारने वंदेभारत मिशन राबवत आहे. 25 मेपर्यंत 158 विमान उड्डाणातून विविध देशात अडकलेल्या 30 हजार भारतीयांना मायदेशात परत आणले. तर पदेशातील 10 हजार नागरिकांना सेवा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या पाकिस्तानच्या 179 नागरिकांना अटारी-वाघा बॉर्डरच्या रस्त्याने पाकिस्तानमध्ये परत पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.