ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉक डाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार आता संपूर्ण देशात 17 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांशी चर्चा करून पुढील परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यावरून लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये तर 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. तर राज्यातील फक्त 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना काही सवलती दिल्या जाणार आहेत.
गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, ग्रीन झोनमध्ये बससेवा सुरू केली जाणार आहे तर ऑरेंज झोनमध्ये काही भागात कॅब सुविधा आणि औद्योगिक सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र रेड झोनमधील निर्बंध कायम रहातील या ठिकाणी फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने खुली रहाणार आहेत.