आरोग्य मंत्रालयाची स्पष्टोक्ती : लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास परिस्थिती चिघळण्याची भीती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोरोना विषाणूच्या समूह संसर्गाला सुरुवात झालेली नाही. आपण अद्याप तिसऱया टप्प्यात प्रवेश केलेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव
अग्रवाल यांनी सोमवारी दिली. कोणत्याही आजारातील तिसरा टप्पा हा समूह संसर्गाचा असतो. देशातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा आतापर्यंत केलेल्या सर्व उपाययोजना निष्फळ ठरतील, असा इशाराही त्यांनी दिला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱया टप्प्यात देश आहे. या रोगाबाबत विकसित देशांच्या तुलनेत भारताने वेळेवर उपाययोजना केल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोना प्रादुर्भाव समूहाला होण्याचे प्रमाण मर्यादित आहे. आतापर्यंत देशात एक हजार 71 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाची लागण झाल्यास घाबरून जाऊ नये, तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनाच्या तीन हजार 501 चाचण्या केल्या आहेत. यातील खासगी प्रयोगशाळांमधून एक हजार 334 चाचण्या केल्या. आतापर्यंत एकूण 38 हजार 442 रुग्णांच्या चाचण्या केल्या आहेत, अशी माहिती ‘आयसीएमआर’चे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.
‘डीआरडीओ’ करणार दररोज 20 हजार मास्कची निर्मिती
पुढील आठवडय़ापासून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) दररोज 20 हजार एन-99 मास्क तयार करणार आहे. पुढील काही आठवडय़ांमध्ये दररोज एक लाख मास्क करण्याचे नियोजन आहे. देशातील सरकारी हॉस्पिटल्समध्ये सध्या 11 लाख 95 हजार एन-95 मास्क आहेत. देशातील विविध रुग्णालयात संपूर्ण शरीराला झाकणारे सुमारे 3 लाख सूट आहेत. विदेशातून तीन लाख सूट आयात केले जातील. 11 कंपन्या पुढील काही दिवसात 21 लाख नवीन सूट तयार करणार असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
दिवसभरात देशात 60 नवे रुग्ण
सोमवारी कोरोनाबाधित 60 रुग्णांची भर पडली. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 17 रुग्ण आढले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार देशभरातील संसर्ग झालेल्यांची संख्या 1071 इतकी आहे. तर 99 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.