ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रामाणिक करदात्यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. मात्र, मूठभर लोकांमुळे प्रामाणिक करदात्यांना त्रास होतो. त्यांच्या हिताचे रक्षण करणारी नवी करप्रणाली आहे. आजपासून देशात ही पारदर्शक करप्रणाली लागू होईल. आत्मनिर्भर भारतासाठी ज्यांना कर भरणे शक्य आहे, त्यांनी कर भरून देशाच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पारदर्शक कराधान मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, प्रामाणिक करदात्यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. करदात्यांच्या सन्मानासाठी देशात नवी कराधान योजना आजपासून लागू होईल. करदात्यांच्या मनातील भीती दूर करणारी योजना ही योजना आहे.
करप्रणालीत मूलभूत सुधारणेची गरज होती. सुधारणा एकदाच करून चालत नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आजपासून पारदर्शक करप्रणाली लागू होईल. या करप्रणालीत सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यात आला आहे. सर्व सेवांना लोककेंद्रित बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भारतात लवकरच ‘टॅक्स चार्टर’ तयार करणार
भारतात लवकरच ‘टॅक्स चार्टर’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे करदात्यांची ट्रान्सफर, पोस्टिंगची कटकट कमी होणार आहे. करदात्याला अपील, समीक्षेचा अधिकार असेल. हे अपिलही फेसलेस होणार आहे. अनावश्यक खटले टळतील. करदात्याला सन्मान मिळेल, असे पाऊल उलचणारे देश जगात फारच कमी आहेत. त्यामुळे कर भरण्यास सक्षम असणाऱ्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी कर भरा, असे आवाहन मोदींनी केले आहे.