सरन्यायाधीश रामण्णा यांनी व्यक्त केली खंत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी कायदा व्यवस्थेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आजही देशात ब्रिटिशांनी केलेली कायदा पद्धतीच लागू आहे. गुलामीच्या काळातील या व्यवस्थेत अद्यापही कोणता बदल घडविण्यात आलेला नाही. कायद्यांची पुस्तके इंग्रजीत असल्याने सर्वसामान्यांना ती कळत नाहीत. कायदा व्यवस्थेचे भारतीयीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. न्यायमूर्ती एम. एम. शांतनगौडर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. कायद्याची परिभाषा 95 टक्क्यांहून अधिक लोकांना कळत नाही, असे मत इतर तज्ञांनीही व्यक्त केले आहे.
न्यायमुर्ती शांतनगौडर सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांशी आणि आवश्यकतांशी निगडित होते. जनहितांचे त्यांचे भान त्यांच्या अनेक निर्णय पत्रांमधून स्पष्टपणे दिसून येतो. गरीब आणि वंचित लोकांच्या संबंधीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी आवाज उठविला होता. त्यांचा निर्णय सोप्या शब्दांमध्ये आणि व्यवहारी पद्धतीचा होता. त्यांची विनोदबुद्धीही कौतुकास्पद होती, अशी प्रशंसा न्यायमुर्ती रामण्णा यांनी केली.