ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
गेल्या 24 तासात 678 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6, 412 वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत 199 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर देशातील 503 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, कोरोनाशी लढण्यासाठी सर्व उपाययोजना तयार आहेत. याअंतर्गत देशात 34 हजार निवारा केंद्र कार्यरत असून, 26 हजारपेक्षा अधिक अन्नकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच कोवीड -19 स्पेशल हॉस्पिटल उभारण्यात येणार आहेत. सध्या देशात दोन ते तीन कोटी टेबलेट्स चा अतिरिक्त साठा उपलब्ध आहे.
तसेच देशातील सीमा भागातील सतर्कता वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरी भागावर आम्ही जास्त लक्ष देत आहोत. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, काल पर्यंत विदेशातील 20 हजार 473 नागरिकांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवण्यात आले आहे. मात्र अजूनही विदेशात अनेक भारतीय अडकून पडले आहेत.