चार दिवसातच रुग्णांमध्ये लाखाने भर : दिवसभरात 500 हून अधिक मृत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोमवारी एकूण बाधितांच्या आकडय़ाने जवळपास 9 लाखांच्या जवळ झेप घेतलेली दिसते. ‘आरोग्य सेतू’ ऍपनुसार देशात आतापर्यंत 8 लाख 78 हजार 254 रुणांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 5 लाख 53 हजार 471 रुग्ण बरे झाले असून 23 हजार 174 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 3 लाख 1 हजार 609 सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारुग्ण असून तेथे एकूण संख्या अडीच लाखांच्याही पुढे पोहोचली आहे.
देशात सोमवारी एका दिवसातील सर्वाधिक 28 हजार 701 रुग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारांहून अधिक झाला असल्याने चारच दिवसात रुग्णसंख्या एक लाखाने वाढलेली दिसून येत आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारत असून आता 63 टक्क्यांच्याही पुढे पोहोचले आहे.
‘आयसीएमआर’ने दिलेल्या माहितीनुसार 12 जुलैपर्यंत 1 कोटी 18 लाख 6 हजार 256 स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. सध्या साधारणपणे एका दिवसाला दोन लाखांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. रविवारी दिवसभरात विविध राज्यांमध्ये 2 लाख 19 हजार 103 चाचण्या करण्यात आल्या. दिल्लीत आतापर्यंत एकूण 7 लाख 89 हजार 853 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.
तामिळनाडू, दिल्लीत रुग्णांमध्ये वाढ
तामिळनाडू आणि दिल्लीत रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तामिळनाडूत आतापर्यंत संक्रमित आढळलेल्या लोकांची संख्या वाढून 1,38,470 झाली आहे. राज्यात आतापर्यंत या महामारीमुळे 1,966 लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात संक्रमितांचा आकडा 29,168 वर पोहोचला आहे. दिल्लीमध्ये कोरोना विषाणूची 1,573 नवी प्रकरणे समोर आली असल्याने एकूण रुग्णसंख्या 1 लाख 12 हजार 494 झाली आहे. दिल्लीत मागील 24 तासात 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत मृतांचा आकडा 3 हजार 371 पर्यंत पोहोचला आहे. मात्र, दिल्लीत आतापर्यंत एकूण 89 हजार 968 रुग्ण बरे झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गुजरातमध्ये 879 नवे रुग्ण
गुजरातमध्ये सुद्धा संक्रमितांचा आकडा वाढत चालला आहे. राज्यात आतापर्यंत 41,820 संक्रमित आढळले आहेत. सोमवारी 879 नवी प्रकरणे समोर आली. राज्यात आणखी 13 नवे मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनाने 2,045 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना महामारी वाढताना दिसत आहे. राज्यात आणखी 1,403 नवे रुग्ण सापडले असून एकूण आकडा 36 हजार 476 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 934 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशात 431 नव्या रुग्णांसह आतापर्यंत 17 हजार 632 संक्रमित सापडले आहेत. राजस्थानमध्ये 644 नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत 24,392 रूग्ण समोर आले आहेत. तर ओडिशात 595 नव्या रुग्णांसह एकूण 13 हजार 121 रुग्ण बाधित झाल्याचे दिसून येत आहे.
रुग्णसंख्या वाढीमुळे लॉकडाऊनची नामुष्की
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यानंतरही देशातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरात आणि काही राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुष्की ओढवली आहे. काही राज्यांनी आणि शहरांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आठवडय़ातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन लागू राहणार आहे. तसेच तामिळनाडू येथील मदुराई शहरात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरसह इतर काही भागात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळूरमध्ये सुरवातीला कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र, अनलॉक नंतर त्यात झपाटय़ाने वाढ झाल्याने 14 ते 22 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय येडियुराप्पा सरकारने घेतला आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.