42 लाख नागरिक बाधित, आतापर्यंत 71 हजार 642 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला मागे टाकले आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्येने आता 42 लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. सोमवारपर्यंत मागील 24 तासांमध्ये तब्बल 90 हजार 802 नवे कोरोनाबाधित आढळले असून, 1 हजार 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 42 लाख 4 हजार 613 वर पोहोचली आहे.
देशातील एकूण 42 लाख 4 हजार 613 कोरोनाबाधितांमध्ये 8 लाख 82 हजार 542 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत उपचाराअंती 32 लाख 50 हजार 429 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी एका दिवसात तब्बल 69 हजार 564 जणांना उपचाराअंती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. देशात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा 71 हजार 642 झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारत दुसऱया स्थानी असून, भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे.