बुलढाणा/प्रतिनिधी
देशात कोरोनाचा शिरकाव होत असताना अनेकांनी सावधगिरीचा इशारा दिला होता. पण भाजपने कोरोना काळात देशात हत्याकांड घडवण्याचं काम केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. देशात कोरोनाचा धोका असतानाही या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त होते. रुग्णसंख्या वाढत असताना केंद्राचं ऑक्सिजन पुरवठ्यावरही लक्ष नव्हतं. देशात ऑक्सिजन अभावी अनेक कोरोना रुग्णांचा जीव गेला आहे. त्यामुळे कोरोनाकाळात मृत्यूचं पाप भाजपने केल्याचा घणाघात नाना पटोलेंनी केला आहे. नाना पटोले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला.
“जागतिक आरोग्य संघटनेने देशात कोरोनाची लाट येत असताना वारंवार सूचना करुनही आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये गुंग होते. आपल्याकडे उपलब्ध असणारी लस पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं काम केलं आणि म्हणून या व्यवस्थेसाठी हेच जबाबदार आहेत. लस बाहेर देशात पाठवल्याने आपल्या देशातील नागरिकांना वेळेवर लस दिली नसल्याने रुग्णांची ख्या वाढली. त्याचबरोबर ज्यावेळी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती त्यावेळी कसा त्याचा पुरवठा झाला तेही आपण पाहिले. म्हणून देशामध्ये एक हत्याकांड या कोरोनाच्या काळामध्ये घडवण्याचं पाप भाजपाने केलं असं आमचे म्हणणे आहे,” असे नाना पटोले यांनी म्हटले.