ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात प्रचंड वेगाने होत असलेला कोरोना संसर्ग आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे अनेकांचे जीव जात आहेत. काहींना उपचाराअभावी तर काहींना उपचारादरम्यान ऑक्सिजन न मिळाल्याने प्राणाला मुकावे लागत आहे. मंगळवारी कोरोनाबळींच्या दैनंदिन संख्येने देशात उच्चांक गाठला.
मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 421 नवीन संक्रमित रुग्ण आढळले. तर 4205 रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात आतापर्यंत 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 37 लाख 04 हजार 099 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 197 रुग्णांचा बळी घेतला आहे.
मंगळवारी 23.8 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, आतापर्यंत देशातील 17.52 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.