ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत, तसेच मृत्यू दरात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 909 रुग्णांची भर पडून देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8 हजार 356 वर पोहचली आहे. तसेच 24 तासात 34 जण दगावले आहेत. देशात 273 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 716 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ते म्हणाले, देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे आसोलेशन बेडची संख्या वाढवली जात आहे. देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 20 टक्के केसेस या मध्यम स्वरूपाच्या आहेत. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आता पर्यंत देशात एक लाख 86 हजार लोकांच्या टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यामध्ये दररोज 15 हजार टेस्ट केल्या जातात. आताच्या स्थितीत कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यावर अधिक भर दिला जात आहे. तसेच 601 रुग्णालयात 1लाख बेड्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठिकाणी लष्कराची ही मदत घेतली जात आहे. तसेच अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयातही तपासण्या सुरू आहेत.
तसेच ‘सायबर दोस्त’ या ट्विटर हॅण्डल ला फॉलो करा. यावर प्रत्येक गोष्टीची माहिती व योग्य सल्ले दिले जात आहेत. मात्र याच बरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे असं ही त्यांनी यावेळी सांगितले.