दिवसभरात 1290 जणांचा मृत्यू : रिकव्हरी दर जवळपास 80 टक्के गाठण्यात यश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात मागील काही दिवसांपासून दररोज 90 हजारांपेक्षा अधिक कोरोनारुग्ण आढळत आहे. देशातील स्थिती गंभीर झाली असून, एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे. मात्र भारतात बरे होण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. भारतात बुधवारी 90 हजार 123 रुग्ण सापडल्यानंतर एकूण प्रकरणे 50 लाख 20 हजार 359 वर पोहचली आहेत. यापैकी सक्रिय रुग्ण 9 लाख 95 हजार 933 आहेत. देशात गेल्या चोवीस तासात 1 हजार 290 मृत्यूंसह कोरोनामुळे जीव गमावणाऱया मृतांची संख्या 82 हजार 66 इतकी झाली आहे.
भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 79 टक्के झाला आहे. गेल्या चोवीस तासात भारतात 39 लाख 42 हजार 360 रुग्ण बरे झाले असून हा जगातील सर्वाधिक बरे होण्याच्या दरांपैकी एक आहे, असे आरोग्य सचिव भूषण यांनी सांगितले. 40 लाखांपासून 50 लाखांचा आकडा भारताने केवळ 11 दिवसात गाठला आहे. सध्या देशात एकूण 9 लाख 95 हजार 933 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 5.8 कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यातील 76 लाख चाचण्या मागील आठवडय़ात केल्या आहेत.
देशातील 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या 5 हजारांपेक्षा कमी आहे. तसेच 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या 5 हजार ते 50 हजारांच्या मध्ये आहे. तर केवळ 4 राज्यांत 50 हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
‘कोरोना’ला हरवण्यात भारतीय जोमात
जगात कोरोनातून बरे होणाऱया रुग्णांच्या प्रकरणात भारत पहिल्या स्थानावर पोहचला. जॉन हापकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडय़ांनुसार, भारतात जवळपास 39 लाख 50 हजार लोक महामारीतून बरे झाले आहेत. भारताने याबाबतीत ब्राझीलला मागे टाकले. जगात महामारीतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 कोटी 15 लाखांच्या जवळपास आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 79 टक्केवर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 39 लाख 42 हजार लोकांनी कोरोनावर विजय संपादन केला आहे.