आतापर्यंत साडेसहा लाख लोकांची कोरोनावर मात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासांमध्ये 34 हजार 884 नवीन रुग्ण आढळल्याने देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाख 38 हजार 716 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 6 लाख 53 हजार 751 लोकांनी मात केली असून रिकव्हरी रेट हा 62.93 टक्क्मयांवर पोहोचला आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचे आतापर्यंत 10 लाख 38 हजार 716 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मृतांमध्ये 671 ने वाढ झाल्याने एकूण आकडा 26 हजार 273 झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 17 हजार 994 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3 लाख 42 हजार 756 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दहा लाखांमागे 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण जगात सर्वात कमी आहे. लक्षणे नसलेल्या वा सौम्य लक्षणे असलेल्या 80 टक्के रुग्णांचे घरगुती विलगीकरण केले जात आहे. त्यांच्यावर सातत्याने देखरेखही ठेवली जात आहे. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी 1.94 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना आता चाचण्यांचा वेग देखील वाढविण्यात आला आहे. 17 जुलैला 3,69,024 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. हा एका दिवसातील चाचण्यांचा सर्वाधिक आकडा आहे. 17 जुलैपर्यंत 1 कोटी 34 लाख 33 हजार 742 स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यानुसार संक्रमितांचा दर 9.66 टक्के इतका झाला आहे.