नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालल्याचे शुक्रवारीही दिसून आले. दररोज 60 हजारांच्यापुढे नवे रुग्ण आढळत असून दिवसभरात देशात 64 हजार 553 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच मागील चोवीस तासात हजारहून अधिक बळींची नोंद झाली आहे. मृतांचा आकडा वाढत चालल्याने चिंतेचे ढग अधिक गडद होत चालले आहेत.
देशात शुक्रवारपर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 24 लाख 61 हजार 190 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 48 हजार 40 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या चोवीस तासांमध्ये 1,007 रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. मृत्यूदर दोन टक्क्मयांपेक्षाही कमी 1.95 टक्क्मयांवर आला आहे. योग्य उपचारांमुळे कोरोनामुक्तांचाही आकडा वाढत असून गेल्या चोवीस तासांमध्ये 55 हजार 573 रुग्ण बरे झाले. हे प्रमाण 71.17 टक्क्मयांवर पोहोचले असून सुमारे 17 लाख 51 हजार 555 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचाराधीन रुग्ण 6 लाख 61 हजार 595 इतके आहेत.
दिवसात जवळपास साडेआठ लाख चाचण्या
आतापर्यंत देशात एकूण 2.76 कोटी चाचण्या झाल्या असून 10 लाख लोकसंख्येमागे 19 हजार 453 चाचण्या केल्या जात आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या. गुरुवारी दिवसभरात 8 लाख 48 हजार 728 जणांच्या चाचण्या केल्या गेल्या. या आठवडय़ात प्रतिदिन 6 लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या गेल्यामुळे दैनंदिन बाधितांचा आकडाही जवळपास 60 हजारांच्या पुढे राहिला आहे.