संक्रमितांसह मृत्यूचा आकडा वाढल्याने चिंता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातच कोरोना संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाही. दिवसागणिक वाढणाऱया कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक यातना सहन कराव्या लागत असतानाच देशात पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशात दुसऱयांदा एका दिवसात चार लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 4 लाख 12 हजार 262 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 3 हजार 980 कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3 लाख 29 हजार 113 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. अजूनही देशात 35 लाख 66 हजार 398 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत भारत जगात दुसऱया स्थानी आहे. जगभरातील दैनंदिन रुग्णवाढीपैकी जवळपास 40 टक्के रुग्ण केवळ भारतातील आहेत. दुसऱया लाटेने भारताला अक्षरशः वेढले असून देशाच्या सर्वच भागात नव्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशात 30 एप्रिल रोजी 4 लाख 01 हजार 993 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर चार दिवसात नव्या रुग्णांमध्ये घट नोंद झाली होती. मात्र, बुधवारी झालेल्या चाचण्यांच्या आकडेवारीमधून आतापर्यंतची सर्वात विक्रमी आकडेवारी समोर आल्याने चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. देशात आतापर्यंत 2 कोटी 10 लाख 77 हजार 410 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2 लाख 30 हजार 168 जणांचे बळी गेले असून 1 कोटी 72 लाख 80 हजार 844 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जागतिक पातळीवर भारताची स्थिती
देशात कोरोनाचा मृत्यूदर सध्या 1.09 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 82 टक्क्मयांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येचा दर वाढून 17 टक्के झाला आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत आणि एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये भारत जगात दुसऱया स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
लसीकरण आणि चाचण्या 5 मेपर्यंत देशभरात 16 कोटी 25 लाख 13 हजार 339 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी एका दिवसात 19 लाख 55 हजार 733 लसीचे डोस देण्यात आले. तसेच आतापर्यंत एकूण 29 कोटी 67 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.