मृतांच्या आकडय़ात प्रथमच मोठी वाढ : चोवीस तासातील बाधित रुग्ण 60 हजारच्या पुढेच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे मृतांच्या संख्येमध्ये सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली. एका दिवसात या महामारीमुळे देशात प्रथमच 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 62,064 नवीन रुग्ण आढळले असून आणि 1007 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात आतापर्यंत 22 लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसात दररोज 60 हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात येत आहेत. त्यातच आता एका दिवसात एक हजारांहून अधिक मृत्यू झाल्याने देशाची चिंता वाढली आहे.
देशातील एकूण रुग्णांची संख्या 22 लाख 15 हजार 74 इतकी झाली आहे. मात्र, उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक झाल्याने थोडाफार दिलासा व्यक्त केला जात आहे. सध्या देशात 6 लाख 34 हजार 945 रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 15 लाख 35 हजार 743 रुग्णांना उपचारानंतर इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. रविवारी एका दिवसात तब्बल 54 हजार 859 रुग्णांना उपचाराअंती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. देशात आतापर्यंत 44 हजार 286 कोरोना संसर्गित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तसेच दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश सारख्या राज्यातही कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.
आतापर्यंत जवळपास अडीच कोटी चाचण्या
देशात आतापर्यंत 2 कोटी 45 लाख 83 हजार 558 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. 9 ऑगस्ट रोजी एका दिवसात 4 लाख 77 हजार 23 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने देशातील रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे, असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.