ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू होत आहे. कोरोनाने प्रभावित इतर राज्यातही कठारे निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, केंद्र सरकारची लॉकडाऊन संदर्भात अद्याप कोणतीही योजना नाही, असे केंदीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी स्पष्ट केले.
सितारामन म्हणाल्या, देशात कोरोनाचा धोका वाढत असला तरी अर्थव्यवस्था ठप्प करुन लॉकडाऊन करण्याची केंद्र सरकारची योजना नाही. कोरोना नियंत्रणासाठी स्थानिक पातळीवर विशेष प्रयत्न केले जातील. उपाययोजनांमधून या संकटाचा सामना केला जाईल. मात्र, संपूर्ण देश लॉकडाऊन होणार नाही.
दरम्यान, दुसरी लाट थोपविण्यासाठी तपासण्या वाढवणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, योग्य उपचारपद्धती आणि लसीकरण ही पद्धत पुन्हा अवलंबण्यात येणार असल्याचे अर्थमंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.