आतापर्यंत 50 लाख रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर
नवी दिल्ली
देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱयांची संख्या अधिक आहे. सोमवारी देशात कोरोनाबाधितांची संख्या 60 लाखांवर पोहोचली. आतापर्यंत भारतात 60 लाख 74 हजार 702 रुग्ण सापडले असून त्यापैकी 50 लाख 16 हजार 520 रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. सोमवार सकाळपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात 74 हजार 893 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. भारतातील कोरोना रुग्णांनी 16 सप्टेंबरला 50 लाखांचा आकडा पार केला होता. अवघ्या 12 दिवसांमध्ये 10 लाख रुग्ण संख्या वाढली आहे. देशभरात दररोज जवळपास 90 हजार कोरोनारुग्ण आढळत आहे.
गेल्या 24 तासांत देशात नव्या 82 हजार 170 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत या धोकादायक विषाणूने 95 हजार 542 रुग्णांचा बळी घेतला असून सध्या 9 लाख 62 हजार 640 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 13 लाख 39 हजार 232 इतकी झाली आहे. यात 35 हजार 571 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 10 लाख 30 हजार 15 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात कोरोना रिकव्हरी रेट 82.58 टक्के आहे. तर, सक्रिय रुग्ण 15.84 टक्के आणि मृत्यूदर 1.57 टक्के आहे. एकूण चाचणींमध्ये पॉझिटिव्ह येणाऱया रुग्णांचा दर 11.58 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 7 कोटी 19 लाख 67 हजार 230 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.